सोलापूर : ‘राज्यातील प्रत्येक गावात वनराई बंधारे उभारण्यात यावेत. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून प्रत्येक गावात शाश्वत जलसिंचनाच्या साठा तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी यांनी केले.
उत्तर सोलापुरातील पाथरी येथे वनराई बंधाऱ्याची श्रमदानाने उभारणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, हिरजच्या सरपंच पुर्वा वाघमारे, पाथरीच्या सरपंच अलका बंडगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त आणि लेखा अधिकारी महेश अवताडे, शिक्षण अधिकारी संजय राठोड, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.
या वेळी सोलापूर जिल्हा परिषद, राज्य शासनाचा कृषी विभाग, केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण विभाग आदी विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी श्रमदान केले.
परदेशी म्हणाले, ‘अनियमित पावसामुळे शेतीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकेंद्रीत पद्धतीने जलसाठे होण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारचे वनराई बंधारे विकेंद्रीत साठे तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतील. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला वनराई बंधाऱ्यामुळे एकप्रकारे पाठिंबाच आहे. पर्यावरण संवर्धनासाठीही वनराई बंधारे उपयुक्त ठरतील.’
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारूड म्हणाले, ‘जिल्हा परिषद टंचाई परिस्थितीसाठी पुढाकार घेऊन काम करेल; तसेच वनराई बंधारे उभारण्यासाठी भर दिला जाईल.’
कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी वनराई बंधारे उभारण्याची प्रक्रिया सविस्तर सांगितली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, नंदकुमार पाटील, सुभाष डोंगरे, नीता चलवादे, अविनाश गोडसे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.